जामखेड न्युज – – – –
गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी ‘शिवशक्ती सेना’ या नव्या पक्षाची घोषणा केली. मात्र, त्यांच्या या नव्या पक्षाची स्थापना कोरोनामुळे लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय. करूणा मुंडे सोमवार, दिनांक २४ रोजी अहमदनगर दौऱ्यावर होत्या. यात कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन करुणा यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला.
दरम्यान, पत्रकारांशी बोलतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असे मुंडे यांनी सांगितलं. त्या मंत्र्यांची नवे मी आत्ता घेणार नाही. मात्र, त्यातील एक राष्ट्रवादीचा तर दुसरा शिवसेनेचा मंत्री आहे असंही त्यांनी म्हटलंय.
नगरमध्ये ३० जानेवारी २०२२ ला मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी पूर्वी सांगितले होते. मात्र, आता करोनामुळे ते लांबणीवर पडले आहे. मुंडे आज नगरला आल्या होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
आज जी परिस्थिती माझ्यावर आहे, तीच अनेक मंत्र्यांच्या कुटुंबातही आहे. राज्यातील विद्यमान दोन मंत्र्यांच्या पत्नी आपल्या संपर्कात आहेत. त्याही शिवशक्ती पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांची नावे आताच जाहीर केली जाणार नाहीत. नगरमध्ये पक्षाची स्थापना केली जाईल, तेव्हा सगळे चित्र स्पष्ट होईल, असं त्या म्हणाल्या.
यानंतर आपल्या तसेच मंत्र्यांच्या पत्नीच्या राहणीमानावरही मुंडे यांनी भाष्य केले. मी राजकारणात येऊ नये, म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अनेकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण एकदा राजकारणात आल्यावर मागे वळायचे नाही, असे मी ठरविले आहे. मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका गाडीतून फिरतात. २५ हजारांच्या साड्या परिधान करतात. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या कपाटात तीन कोटींच्या साड्या आहेत. पण माझ्याकडे कपाटात पाच लाखांच्याही साड्या नाहीत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी, आपण लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. राज्यातील अनेक कामे प्रलंबित असताना दुसरीकडे सरकारने मंत्र्यांची दालने आणि आमदार निवासावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे ठरविले आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही राज्यभर दौरा सुरू केलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, न डगमगता माझे कार्य पुढे सुरू ठेवणार आहे. आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही येणार आहेत. त्यासाठी आमची त्यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. करोनाचे संकट कमी झाल्यावर नगरमध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.