जामखेड न्युज – – –
‘मुलगी झाली हो’या स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘ईलास पाटला’ची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते किरण यांना अचानक मालिकेतून काढण्यात आल्या नंतर कलाक्षेत्रापेक्षा अधिक राजकीय वातावरण ढवळून निघत असून समाज माध्यमातून त्यांना मालिकेतून काढण्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
अभिनेते किरण माने समाज माध्यमातून विशेषतः फेसबुक पोस्टद्वारे वादग्रस्त ठरवले गेले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्रात आपल्या राजकीय भूमिका खास आपल्या शैलीत अनेकदा मांडल्या आहेत. विशेष करून या पोस्टना भाजप,पंतप्रधान मोदी यांचा संदर्भ लावला गेला.
यानंतर त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले. याबद्दल संबंधित वाहिनेने अद्याप कोणताही खुलासा केला नसला तरी आता यात नेटकऱयांसह राजकीय नेत्यांनी उडी मारत आपापल्या भूमिका मांडत अभिनेते किरण माने यांना समर्थन व्यक्त करताना राजकीय निशाणा साधला आहे.
या बाबत आ.रोहित पवार यांनीही समाज माध्यमातून आपली भूमिका मांडताना #IStandWith_KiranMane हा हॅशस्टेग वापरत आपले मत व्यक्त करताना ‘हा दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा निर्घृण खून’ आहे असे म्हंटले आहे.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल.
केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारे नाही.









