जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप पर्यंत प्रोत्साहन रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच सन २०१९-२० व २०२०-२०२१ मध्ये नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जाचे व्याजही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तरी प्रोत्साहन रक्कम व व्याज परतावा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी केली आहे .
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी केलेली आहे. त्यावेळी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सदरील प्रोत्साहन रक्कम जमा झालेली नाही. थकबाकीदार कर्जदराचे कर्ज माफ होऊन त्यांना पुन्हा नव्याने कर्ज वितरण झालेले आहे. तरी देखील नियमित कर्ज भरणाराच्या खात्यावर अद्यापपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नाही.
ADVERTISEMENT 

मागील २ वर्षापासून शेतकरी हा कोरोना महामारीने पूर्णपणे होरपळून निघाला आहे. अतिवृष्टी, शेतमालाला असणारा कमी भाव, बियाणे, रासायनिक खत व मजुरीचे वाढलेले दर लक्षात घेता शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा कठीण परीस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या वर्षी कर्जाची परतफेड करणे मुश्कील होणार आहे.
ADVERTISEMENT 

शासनाने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळणार या आशेवर राज्यातील लाखो कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे. त्यासाठी अनेकांनी दागिने विकून, गहाण ठेऊन, हातउसणे पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्ज नियमित करून घेतले आहेत.
ADVERTISEMENT 

जिल्हा बँकेचा संचालक या नात्याने ज्या ज्या ठिकाणी गेलो. त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी फक्त एकच प्रश्न विचारत आहे कि, साहेब ५०००० कधी भेटणार नियमित कर्ज भरून आमची चूक झाली का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये नियमित कर्जदार सभासदांना बाजूलाच ठेवले आहे. भविष्यात नियमित कर्ज भरणारे शेतकरी कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता आहे.त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढून सर्व संस्था, बँका अडचणीत येण्याची भीती संचालक अमोल राळेभात यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी दुर करणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्न करील. प्रोत्साहनपर जाहीर केलेली पन्नास हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा करावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी केली आहे.



