जामखेड तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर! भर पावसाळ्यात टँकरचे पाणी, शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला, कोट्यवधींच्या जलजीवन योजनेचा बोजवारा
जामखेड तालुक्यात अल्प पावसावर उशीरा खरीप पेरण्या ८६ टक्के झाल्या आहेत. सोयाबीन, उडीद मुग व इतर पिके फुलात आले असताना पावसाने दडी मारल्याने सर्व पिके धोक्यात आली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले परंतु अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही व वावरातून पाणी बाहेर पडले नाही. त्यामुळे नदी, नाले व तलावात पाणी न आल्यामुळे कोरडेठाक पडले आहेत. तीन टॅंंकरने तालुक्यात पाणीपुरवठा चालू असून दहा ठिकाणी. विहीरी अधिग्रहण करण्यात आली आहे. अल्प पावसामुळे तालुक्यात भिषण टंचाईची चाहूल लागली आहे.
जामखेड तालुका रब्बीचा म्हणून ओळखला जात असला तरी खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मुग या नकदी पिकामुळे शेतक-यांना बुस्टर डोस मिळत आहे. तालुक्यात खरीप पिकाचे उद्दीष्ट ६२ हजार १९५ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी तालुक्यातील खरीप पिकांच्या पेरण्या १५ जुन अखेर पुर्णत्वास येत असे पण यावर्षी जुन महिन्याच्या २३ तारखेपासून दोन तीन दिवस झिम पाऊस आला व त्या पावसावरच जुलैच्या पहिल्या आठवडय़ात ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. जुलै महिन्यात ५ व ६ रोजी भिज पाऊस झाला या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले होते.
आँगस्ट महीन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस येईल अशी शक्यता होती परंतु महीना सरत आला तरी समाधानकारक पाऊस पडेना. अनेकांचे हवामान अंदाज चुकत आहे. त्यातच अल निनोचा प्रभाव वाढत आहे. अधुन मधुन येणारा पावसाचा फटकारा पडला तरी खरीप पिकाचे उत्पादन होऊन उत्पन्न वाढेल व शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैसा मिळेल अशी अपेक्षा असताना उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे.
भुतवडा, खैरी प्रकल्प वगळता इतर तलाव कोरडेठाक
———————-
पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले आहे पण समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन पाण्याची आवक तलावात झाली नाही. आहे तो पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. खैरी प्रकल्पात १०.८ दशलक्ष घनफूट तर जुना भुतवडा तलावात ८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. तर रत्नापूर, धोत्री, मोहरी, घोडेगाव, धोंडपारगाव व नवीन भुतवडा तलावात निरंक पाणीसाठा आहे. तसेच नदीला पाणीच नसल्याने पाचही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कोरडेठाक पडले आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने भुतवडा व खैरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला आहे. जलाशयाकडे जाणारा विद्युत पुरवठा भरारी पथकामार्फत पूर्णतः बंद केलेला आहे. तालुक्यात राजेवाडी, खुरदैठन व बांधखडक या ठिकाणी टॅंंकरने पाणीपुरवठा तर १० गावात बोअर विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
‘जलजीवन’च्या कामावरही प्रश्नचिन्ह गावागावात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. मात्र, आजही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत असल्याने या योजनेच्या प्रत्यक्ष परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जलजीवनच्या कामावर मोठा खर्च होऊनही नागरिकांची तहान भागत नसेल, तर या कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि पाणी उपलब्धतेचा स्रोत यांचा आढावा घेण्याची गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.