किल्ले रायरेश्वरावर पिंपळवाडी ग्रामस्थांचा श्रावण सोमवारी धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रम
पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी किल्ले रायरेश्वर येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले. श्री रायरेश्वर महाराजांचा विधिवत अभिषेक करून ग्रामस्थांनी भक्तिभावाने दर्शन घेतले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रायरेश्वर महाराजांच्या अभिषेकानंतर भाविक व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गडावरील परिसर स्वच्छ करून प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत किल्ले रायरेश्वर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून हा धार्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महारुद्र नेमाने, डॉ. सतीश घोलप, देविदास घोलप, भाऊसाहेब घोलप, भीमराव टेकाळे, वसंत नेमाने, तुकाराम नेमाने, अंकुश नेमाने, वाल्मीक घोलप, श्रीराम मोरे, प्रा. दादासाहेब मोहिते यांच्यासह पिंपळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रावण महिन्याच्या पावन पर्वात रायरेश्वर महाराजांच्या अभिषेकासोबतच गडाची स्वच्छता व वृक्षारोपण करून पिंपळवाडी ग्रामस्थांनी धार्मिक परंपरेला सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमाची जोड दिली.