जामखेड तालुक्यातील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर राज्य शासनाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच इमारत जीर्ण झाल्याने घेतलेल्या या निर्णयानंतर या कारागृहातील एकूण ६२ आरोपींना बुधवारी दि. ९ जुलै रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.
यापुढे जामखेड न्यायालयाने दिलेल्या कोठडीतील सर्व कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहातच ठेवले जाणार आहे.
राज्य शासनाचा मोठा निर्णय राज्य शासनाने राज्यातील सुरक्षेचा आढावा घेऊन आणि अनेक ठिकाणच्या कारागृहांची इमारत जीर्ण झाल्याचे तसेच कैदी पळून जाण्याच्या घटना वाढल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार सर्व दुय्यम कारागृहांतील कैद्यांना टप्प्याटप्प्याने जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कारागृह व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे.
जामखेड मधील ६२ आरोपींचे स्थलांतर राज्य शासनाच्या आदेशानुसार जामखेड येथील दुय्यम कारागृहातील सर्व आरोपींचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया बुधवारी पूर्ण करण्यात आली.
दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ६२ आरोपींना पोलीस वाहनांच्या ताफ्यातून नाशिककडे रवाना करण्यात आले. या आरोपींमध्ये ५९ पुरुष आणि ३ महिला आरोपी आहेत.
स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ताफा नाशिक मध्यवर्ती कारागृहात सुखरूप पोहोचला.
यापुढे काय? जामखेडचे दुय्यम कारागृह बंद झाल्यामुळे यापुढे जामखेड न्यायालयातून कोणत्याही आरोपीला कोठडी सुनावल्यानंतर त्याला थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहातच दाखल केले जाणार आहे. त्यामुळे पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणेवर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून जामखेड येथे कार्यरत असलेले हे दुय्यम कारागृह बंद झाल्याने स्थानिक पातळीवरही याची चर्चा आहे.