पाऊस सुरू… धोका वाढला! जामखेडकरांसाठी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांचा सुरक्षा संदेश
राज्यात पावसाने जोर धरला असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केले आहे.
पावसाळ्यातील संभाव्य धोके आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात प्रांजलताई यांनी एक व्हिडिओ संदेशाद्वारे जामखेड तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधला आहे.
प्रांजलताईंचा महत्वाचा सुरक्षा संदेश
व्हिडिओमध्ये प्रांजलताईंनी नागरिकांना पुढील सूचना केल्या: 1. नदी-नाल्यांपासून दूर रहा : पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पूल, बंधारे आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे.
2. मुलांची विशेष काळजी घ्या : लहान मुलांना पावसात एकटे बाहेर खेळण्यासाठी सोडू नये. शाळेत जाताना-येताना पालकांनी सोबत रहावे.
3. वीजेच्या खांबांपासून सावधान : पाणी साचलेल्या ठिकाणी तुटलेले वीजेचे तार दिसल्यास तात्काळ महावितरण किंवा प्रशासनाला कळवावे. . 4. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा : मुसळधार पाऊस आणि वादळाच्या वेळी घरातच सुरक्षित राहावे.
5. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा: कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत 112 किंवा स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
“निसर्गासोबत आपणही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आपली एक छोटीशी काळजी आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकते,” असे प्रांजलताई यांनी यावेळी सांगितले.