जामखेड न्युज—–
एनपीएस पेन्शन भ्रमाचा भोपळा जुन्या पेन्शन साठी एकजूट व्हा – सुभाष तळेकर
एकजुटीमुळे कर्मचारी संप यशस्वी करू – नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे
२१ एप्रिल पासून सरू होणाऱ्या बेमुदत संपाबाबत समन्वय समितीची बैठक

शासनाने २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारून नवीन एनपीएस पेन्शन योजना लागू केली आहे. नवीन पेन्शन म्हणजे भ्रमाचा भोपळा आहे. ते साठलेले पाणी आहे. ज्युनी पेन्शन म्हणजे वाहता झरा आहे. तो कर्मचारी यांचा हक्क आहे. त्यामुळे जुनी पेन्शन आम्ही घेणारच असा निर्धार आजच्या बैठकीत समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी मुख्याध्यापक व शिक्षक संघटना समन्वय समिती अहिल्यानगर यांच्या वतीने आज जामखेड येथे समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष तळेकर समन्वयक रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष विलास पेद्राम, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, जामखेड तालुका समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाडळे, नायब तहसीलदार किशोरी त्र्यंबके, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, उपाध्यक्ष जाकिर शेख, चांगुणे, मोहन यादव यांच्या सह अनेक विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभाष तळेकर म्हणाले की, नवीन पेन्शन दोन वेळच्या चहासाठी पण पुरती मिळत नाही. आपण एकत्रित येऊन जुनी पेन्शन मिळवूच असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाडळे म्हणाले की, आपल्या मागण्या साठी आपला संप आपण यशस्वी करू
यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे म्हणाले की, संघटनेच्या दबावामुळे कर्मचाऱ्यांना काही फायदे मिळतात नवीन पेन्शन म्हणजे फक्त दिल्यासारखे सरकार दाखवत आहे प्रत्यक्षात काहीही दिले जात नाही.





