जामखेड न्युज——
ऋतुराज सोनवणे महाराष्ट्र सुरक्षा बलात भरती
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श
श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील ऋतुराज महादेव सोनवणे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या यशाचे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

ऋतुराज यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून व ग्रामीण भागात झाले आहे. त्यांच्या कुटुंबात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही, आई-वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यासाठी अपार कष्ट केले. आर्थिक अडचणी असूनही ऋतुराजने सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.

ऋतुराज हा आपल्या गावातून तसेच नातेवाईकांमध्ये प्रथमच शासकीय सेवेत भरती झालेला युवक ठरला असून, त्यामुळे हे यश केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण गावासाठी अभिमानाचे ठरले आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. राज्यातील महत्त्वाच्या शासकीय आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी MSF कडे असते. शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी थेट योगदान देण्याची संधी यातून मिळते.



