जामखेड न्युज – – –
पुन्हा एकदा भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. श्रीनगरमधील दानमर भागातील अलमदार कॉलनी येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर ए तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस हे ज्वाइंट ऑपरेशन राबवत असून सध्या या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील चकमक आज पहाटे सुरु झाली आणि अजूनही या भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने जम्मू-काश्मीर आणि श्रीनगर भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. कालच दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करचा कमांडर अबू हुरैरा याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.
एका महिन्यात 12 दहशतवादी ठार
जुलै महिन्याच्या 14 दिवसात जम्मू काश्मीरमध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याआधी 2 जुलै रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर 8 जुलै रोजी 2 पाकिस्तानी दहशतवादी चकमकी दरम्यान मरण पावले. या ऑपरेशनमध्ये एक ज्युनियर कमिशन ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले. 12 जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये दादलच्या जंगलात जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.