जामखेड न्युज – – –
अहमदनगरचे राजकारण सर्वश्रुत आहे. दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. आता अहमदनगरमध्ये काही राजकीय उलथापालथ होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे नगरचे पालकमंत्री बदलाचा निर्णय विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर म्हणजे २० जूननंतर घेतला जाणार आहे.
म्हणजेच नगरचे पालकमंत्री आता बदलले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे दोन सदस्य राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यापैकी एक बाळासाहेब हराळ व दुसरे भाजपचे आणि विखे यांच्या जवळचे आहेत. पुढील गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर फाळके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील सूतोवाच केले. यावेळी फाळके म्हणाले, पक्षाच्या जिल्हा संघटनेने श्रेष्ठींकडे जिल्ह्याला आणखी एका मंत्रीपद देण्याची तसेच बदलानंतर पालकमंत्री पद जिल्ह्याकडेच ठेवावे, अशीही मागणी केलेली आहे. जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत. त्यामुळे आणखी एक मंत्रिपद मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे.
वर्धापन दिनाची भेट म्हणून आम्हाला आणखी एक मंत्रिपद मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी यावेळी कर्जत-जामखेडचे भाजपचे माजी मंत्री व माजी आमदार प्रा. राम शिंदे यांना विधान परिषदेवर दिलेल्या संधींबाबत बोलताना म्हणाले की, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी ताकद देण्यासाठी नव्हे, तर पुढील विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले नसते,
म्हणून दिली असल्याचा टोला फाळके यांनी लागावला. भाजपने प्रा. शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना कर्जत-जामखेडमध्ये व नगर जिल्ह्यात राजकीय ताकद देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत असले तरी हा दावा फाळके यांनी खोडून काढला.









