जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राज्यातील ३६ जिल्ह्यांना गेल्या २७ दिवसात अथक प्रवासातून भेट देत नवाच विक्रम रचलेल्या स्वराज्य ध्वज मोहिमे अंतर्गत फिरणारी आणि जागोजागी स्थानिकांचे प्रेम, आशिर्वाद मिळवणारी स्वराज्य ध्वज यात्रा आता या अनोख्या ध्वजाचे संकल्पनाकार आणि आयोजक आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघाला आजपासून भेट देते आहे. या निमित्ताने आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार या देखील यात्रेत सहभागी होऊन स्थानिकांशी जनसंवाद करत आहेत. आज सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी स्वराज्य ध्वजाने कर्जत-जामखेड तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. आज दिवसभरात भोसे, शिंदे, रुईगव्हाण आणि बिटकेवाडी (ता. कर्जत) या गावांमध्ये स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी स्वराज्य ध्वजाचं स्वागत करून पूजा केली.
आजपासून माझ्या मतदारसंघातील विविध गावांत ‘स्वराज्य ध्वज’ नेण्यात येईल, त्या निमित्ताने इथल्या ग्रामस्थांनाही या प्रेरणाशाली स्फूर्तीध्वजाला अभिवादन करण्याची संधी मिळेल असं यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा, महिला भगिनी आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक गावात स्वराज्य ध्वजाचे जल्लोषात स्वागत करून पूजा करण्यात येत आहे. आज वडगाव तनपुरा, सुपेकरवाडी, कुळधरण, कोपर्डी या गावात ध्वजाची सन्मानाने पूजा करण्यात आली.
महाराष्ट्राच्या तेजस्वी अस्मितेची ध्वजा भारताच्या कानाकोप-यात पोहोचवत गेल्या नऊ सप्टेंबर पासून कर्जत-जामखेड तालुक्यापासूनच सुरू झालेली स्वराज्य ध्वज यात्रा आता तालुक्यात परतली आहे. राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार आणि प्रयोगशील नेतृत्व रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने शिवतेजाचा आणि स्वराज्य धर्माचा वारसा पुन्हा एकदा राज्यातील असंख्य नागरिकांसमोर आलाय. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अथक प्रेरणादायी प्रवास करून या ध्वजाने वेगळाच विक्रम केला आहे. सर्वांसाठीच पथदर्शक ठरलेल्या या स्वराज्य ध्वजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची ओळख पूर्ण देशभरात नेली.
माळेवाडी, खुरगेवाडी, चांदे खुर्द आणि चांदे बुद्रूक (ता. कर्जत) या गावांमध्येही फुलांची रांगोळी काढून आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘स्वराज्य ध्वजा’चं स्वागत करण्यात आलं. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ग्रामस्थ यांनी ध्वजाची पूजा करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
वालवड, रेहेकुरी, चखालेवाडी आणि शिंपोरा इथंही स्वराज्य ध्वजाचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. यावेळी रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार या देखील आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. जाज्वल्य इतिहासाचं प्रतिक असणा-या या मंगल ध्वजाची वाजत-गाजत मिरवणूक काढून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी ध्वजाची पूजा केली.
तब्बल २७ दिवसांचा सलग प्रवास करत ही स्वराज्य ध्वज यात्रा शेवटच्या मुक्कामात मागील रविवारी पंढरपूरात पोहोचली होती. तिथे आमदार रोहित पवार यांनी श्री विठ्ठलचरणी स्वराज्य ध्वज ठेवल्यानंतर ध्वजाचे मंगल पूजन करण्यात आले होते. त्यानंतर ध्वज पवार यांच्या मतदारसंघातील गावांमधील प्रवासासाठी मार्गस्थ झाला होता.
७४ मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर फडकवला जाणारा हा स्वराज्य ध्वज देशभरातला सर्वात उंच ध्वज मानला जातोय. या अनोख्या भगव्या ध्वजाने जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आहे.
सर्वांच्या अभिमानाचा विषय ठरलेला स्वराज्य ध्वज विक्रमी उंचीचा असल्याने तसेच विक्रमी सलग वाटचाल करत असल्याने त्याची दखल देशपातळीवरही घेतली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या सक्षम मार्गदर्शनाने स्वराज्य ध्वजाची ही मोहिम लोकांकडून प्रशंसा मिळवत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्यातल्या या वाटचालीत स्वराज्य ध्वजाने हजारो युवांना स्फूर्ती संदेश देऊन प्रेरीत करण्याचं कार्य केलेलं आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी व आदर्श स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी ही नावीन्यपूर्ण कल्पना राज्यात यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचीही सर्वत्र प्रशंसा होत आहे.
महाराष्ट्राची वीररसपूर्ण गौरवशाली परंपरा देशभर पोहोचवण्यासाठी सुमारे महिनाभर सातत्याने स्वराज्य ध्वज मोहिमचे वाहन राज्यातील सर्व जिल्हयात तसेच देशात फिरले. अनेक जिल्हा, शहरे, गावांमधून स्थानिकांनी स्वराज्य ध्वजाला मनापासून आशिर्वाद दिले आहेत. अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिमेने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास पार पाडला. सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला सर्व थरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतला होता. आतापर्यंत हजारो नागरिकांनी या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.
महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत केले गेले. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला. आतापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आदी पाच इतर राज्यांमध्ये देखील हि ध्वज यात्रा पोहोचली आहे.
सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीच्या या वैशिष्टयपूर्ण भगवा ध्वजाने महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत प्रवास केला अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वज संकल्पनेला ध्वज मोहिम यात्रेचं मूर्त स्वरूप दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होत आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना होती. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास केला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न झाली. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करा.