जामखेड न्युज – – –
महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा 15 ऑगस्टला श्रीगणेशा झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अॅपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी अॅपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. जामखेड तालुक्यात देखील तहसीलदार, मंडलाधिकारी, कामगार तलाठी पीक पाहणी अॅपचा वापर करण्याचं आवाहन करत आहेत.
ई पीक पाहणी नोंदवण्यास 7 दिवस बाकी
ई पीक पाहणी अॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत.
बांधावर शेतकऱ्यांचं प्रबोधन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
जामखेड तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. गावातील सुशिक्षित मंडळी, शिक्षक, डाटा आॅफरेटर, यांना ई-पीक नोंदनीचे प्रशिक्षण देत आहेत. येत्या सात दिवसाच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला मुकावे लागणारा आहे.
शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा अद्यापही अल्प प्रमाणात प्रतिसाद आहे त्यामुळे आता स्वतः तहसीलदार
मंडलाधिकारी, तलाठी हे गावोगावी जात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲप ची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करण्याचे आवाहन करत आहेत.
ई-पीक पाहणी देशाला मार्गदर्शक ठरेल
ई पीक पाहणी अॅपचं लाँचिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-पीक पाहणी अॅप देशाला मार्गदर्शक ठरेल, असं म्हटलं होतं. आज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. ई पिक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.









