जामखेड न्युज – – —
कर्जत-जामखेडच्या ताकदीने ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव : रोहित पवार
जामखेडमध्ये शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवारांचा भव्य सत्कार; हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती
कर्जत-जामखेडकरांनी माझ्या पाठीशी उभी केलेल्या ताकतीच्या जोरावरच राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करता आला. अन्नत्याग उपोषण व विविध आंदोलनांमुळे राज्यातील ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, तसेच कांद्याच्या भावासाठी केलेल्या आंदोलनामुळे कांद्याला ५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत भाव मिळवून देता आला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले.

जामखेड तालुक्यातील शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या सत्काराचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, “विरोधकांनी माझ्या उपोषणावर आणि आंदोलनांवर टीका केली. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा हा संघर्ष यापुढेही सुरूच राहील.”

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने केले अन्नत्याग आंदोलन
राज्य सरकारने यापूर्वी फसवी कर्जमाफी दिली होती. त्याचा अभ्यास करून आपण सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा राज्यातील ३८ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा झाला, असा दावा रोहित पवार यांनी केला.
कांद्याच्या भावासाठी नाशिक, चांदवडमध्ये आंदोलन
कांद्याला अवघा पाच रुपये भाव मिळत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाशिक आणि चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर कांद्याच्या भावात वाढ झाली असून आज कांद्याला ३८ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.





