जामखेड न्युज – – – – –
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली : आकाश बाफना
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन; साठेनगर येथे जयंती उत्साहात साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील साठेनगर येथे शिवसेना युवा नेते आकाश बाफना व मित्रमंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला व साहित्यिक योगदानाला अभिवादन करत सामाजिक समतेचा संदेश दिला.

यावेळी बोलताना शिवसेना युवा नेते आकाश बाफना म्हणाले, “काही माणसं जन्माने मोठी नसतात, तर आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात. लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे त्यापैकीच एक होते. त्यांना औपचारिक शिक्षण फारसे मिळाले नसले, तरी जीवनाच्या विद्यापीठाने त्यांना घडवले. त्यांनी दिन-दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना स्वतः अनुभवल्या. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून केवळ शब्द नव्हे, तर वेदना, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा आवाज उमटला. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि लोकशाहीर म्हणून केलेल्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या विचारांमधून समाजात समता, बंधुता आणि स्वाभिमानाची भावना रुजली असून आजही त्यांचे साहित्य प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.





