Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो...

जामखेडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
4

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गडावर गुरुवारी (दि. 16) दुपारी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.टाळ-मृदंग, वीणेच्या सुरावटी, हरिनामाचा अखंड गजर आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”, “गहिनीनाथ महाराज की जय”, “संत वामनभाऊ महाराज की जय” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र स्थळावरून दरवर्षी निघणाऱ्या संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याला वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असून, यंदाही गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली.

गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी आणि मातकुळी असा प्रवास करत पालखी गुरुवारी सकाळी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे दाखल झाली. त्यानंतर जामखेड शहरात प्रवेश होताच तपनेश्वर मंदिर परिसरात श्री नागेश्वर भजनी मंडळाने टाळ-मृदंग आणि वीणेच्या साथीने हरिनामाचा गजर करत पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांसोबत हरिनामात सहभागी होत सोहळ्याला उपस्थिती लावली.
पालखीच्या मार्गावर शहरातील विविध भागांमध्ये महिलांनी सडा-रांगोळी काढून भक्तिभावाने स्वागत केले. नागरिकांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी फळे, चहा, बिस्किटे, नाश्ता, औषधे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. शहरातील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पुढे जगदाळेवस्ती येथे वारकऱ्यांसाठी पंगतीचे आयोजन करण्यात आले.


सायंकाळी पालखीचे आगमन जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिरात होताच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आष्टीचे माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यानंतर मंदिराच्या भव्य प्रांगणात पालखीचा रथ मध्यभागी उभा करून पारंपरिक गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. पताकाधारी वारकरी, विणेकरी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीभोवती भरधाव प्रदक्षिणा घालत होते. हरिनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
रिंगणानंतर वारकरी परंपरेतील खेळिया अभंग सादर करण्यात आले. महंत विठ्ठल महाराजांनी स्वतः अभंग गायन केले.

त्यांच्या अभंगांच्या सुरावटीवर वारकऱ्यांनी पारंपरिक खेळ सादर केले. महिला आणि पुरुष भक्तांनी फुगड्या खेळत भक्तीचा आनंद लुटला. या वेळी जमादारवाडी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगणादरम्यान वारकऱ्यांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

जामखेड परिसरातून दरवर्षी अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा आणि जमादारवाडी येथे होणारे गोल रिंगण हे या परिसरातील एकमेव आणि अत्यंत भव्य धार्मिक आकर्षण मानले जाते. त्यामुळे हा सोहळा भक्तांसाठी पर्वणी ठरतो. राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले असून, रिंगणानंतर जमादारवाडी येथे भोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पालखीचा मुक्काम सारोळा येथे झाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!