जामखेड न्युज – – – – –
जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ६२ आरोपींचे कडेकोट बंदोबस्तात नाशिकला स्थलांतर
जामखेड तालुक्यातील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर राज्य शासनाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच इमारत जीर्ण झाल्याने घेतलेल्या या निर्णयानंतर या कारागृहातील एकूण ६२ आरोपींना बुधवारी दि. ९ जुलै रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.

यापुढे जामखेड न्यायालयाने दिलेल्या कोठडीतील सर्व कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहातच ठेवले जाणार आहे.

राज्य शासनाचा मोठा निर्णय
राज्य शासनाने राज्यातील सुरक्षेचा आढावा घेऊन आणि अनेक ठिकाणच्या कारागृहांची इमारत जीर्ण झाल्याचे तसेच कैदी पळून जाण्याच्या घटना वाढल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार सर्व दुय्यम कारागृहांतील कैद्यांना टप्प्याटप्प्याने जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कारागृह व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे.





