जामखेड न्युज – – – – –
आ. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा – विनाअट सरसकट कर्जमाफी व विद्यार्थी प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची विनाअट, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेतून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी सातत्याने आवाज उठवत असलेले आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटींबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भातही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. या अटींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत त्या तातडीने हटवण्याची मागणी त्यांनी केली.

विनाअट सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आ. रोहित पवार यांनी यापूर्वी पंढरपूरमध्ये ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने रोहित पवार यांनी पुन्हा ‘एल्गार अन्नदात्याचा’ या नावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन उभारलं.




