जामखेड न्युज – – – – – –
शिष्यवृत्ती परीक्षेत बांधखडक शाळेचे ७ विद्यार्थी पात्र
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ‘मिशन आरंभ’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित ‘मिशन आरंभ’ उपक्रमाची शाळेत वर्षभर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आल्याने तालुक्यातील नायगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडकचे तब्बल ७विद्यार्थी दि.२२फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी दिली.

सदर परीक्षेत कु.अक्षरा अमोल वारे (२२०),चि.आदिनाथ विजय वारे (१७४),कु.संस्कृती भाऊसाहेब वारे (१६२),कु.प्रिती संजय नन्नवरे (१५८),कु.नयना बाबासाहेब जावळे (१५४),कु.समृद्धी महेश काकडे (१४८) व कु.स्वरा दादाहरी दराडे (१३४) हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

मिशन आरंभ उपक्रमांतर्गत वर्षभरातील एकूण १०सराव परीक्षा , रविवारी व सुट्टीच्या दिवशी घेतलेले जादा तास तसेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात रोज सायंकाळी ६:०० ते रात्री९:३० या वेळेत शाळेत घेण्यात आलेल्या ‘रात्र तासिका’ यांमुळे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण व परिणामकारक सराव झाला.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्षभर झालेल्या ऑनलाईन तासिकांच्या मार्गदर्शनाचा देखील या यशात महत्त्वाचे योगदान आहे.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इ.५वीसाठी सुरू झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे हे अखेरचे वर्ष असून प्रतिवर्षीच्या तुलनेत या वर्षीचे पेपर अत्यंत कठीण असल्याचे सार्वत्रिक मत समाजमाध्यमात असल्याने जिद्द व मेहनतीने मिळालेल्या या उज्ज्वल यशाबद्दल पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्वातंत्र्यदिनी वरील विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.





