उन्हाच्या तीव्रतेमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होत असून आमदार रोहित पवार यांनी आज या विषयावर कालच (शुक्रवार, दि. १५) शेतकऱ्यांसह पुण्यात सिंचन भवन येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कुकडी आणि सीनाचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज (शनिवार दि. १६ मे) सीना धरणाचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्याची तसेच सीनातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची आणि उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात सिंचन भवन येथे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता आणि इतर अधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक घेऊन कुकडी आणि सीनातून तातडीने दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली.
त्यांच्या या मागणीला यश आले अूसन बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी सीनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. याचा कर्जत तालुक्यातील तब्बल २१ गावांना शेतीसाठी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी फायदा होणार आहे. लाभक्षेत्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत हे आवर्तन पोहोचावे यासाठी ते किमान २१ दिवस सुरू ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सीनाचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे पाण्याअभावी होरपळणाऱ्या पिकांना दिलासा मिळणार आहेच पण पिण्याच्या पाण्याच्या निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नातूनही दिलासा मिळणार आहे. याबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवार यांचे आभार मानण्यात येत आहेत.
दरम्यान, कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यानुसार २५ तारखेपर्यंत कुकडीचे आवर्तन सोडण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले, परंतु पाण्याची गरज लक्षात घेता त्यापूर्वीच आवर्तन सोडण्याची मागणी आणि आग्रह आमदार रोहित पवार यांनी धरला आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन कधी सोडण्यात येते त्याकडेही कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.