वादळी वाऱ्यामुळे सारोळा येथील आंबा व लिंबोणीची बाग भूईसपाट
संजय काळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जामखेड तालुक्यात दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सारोळा येथील संजय दगडू काळे यांची आंबा व लिंबोणीची बाग वादळामुळे भूईसपाट झाली आहे.
आज बुधवार दि. १३ रोजी दुपारी व सायंकाळी झालेल्या वादळामुळे धामणगाव, नान्नज, बऱ्हाणपूर, सारोळा या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली पत्रे उडाले, झाडे पडली, कांदा भिजला, आंबा पिकांचे मोठे नुकसान कच्च्या आंब्याचा जमीनीवर खच तसेच अनेक ठिकाणी फळबागा उन्मळून पडल्या आहेत.
जामखेड तालुक्यामधील सारोळा संजय दगडू काळे यांची आंबा व लिंबोणीची वीस वर्षापासून जपलेली बाग भुईसपाट झाली आहे यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोठ्या कष्टाने जपलेली बाग आज वादळामुळे भुईसपाट झालेली पाहून काळे यांच्या डोळ्यात पाणी आले.
नुकसानीची माहिती सरपंच, कामगार तलाठी, ग्रामसेवक यांना दिली आहे. उद्या सकाळी ते पंचनामा करण्यासाठी येणार आहेत.
अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.