आश्वासनाची पूर्तता केली नाहीतर 15 एप्रिल रोजी कार्यालयात आंदोलन करणार – आरती देवमाने
महावितरणच्या लेखी आश्वासनाने रस्ता रोको आंदोलन स्थगित.
महावितरणकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर जामखेड करमाळा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळा येथे शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरणचे कटकधोंड कार्यकारी अभियंता महावितरण यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आरती देवमाने यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांनी केलेला रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या आरती देवमाने यांनी ही माहिती दिली असून, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निर्धारित कालावधीत न झाल्यास येत्या 15 एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
जवळा 33 /११ केव्ही व परिसरात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणारे लोडशेडिंग, कमी दाबाने येणारी वीज, तसेच तांत्रिक बिघाड वेळेत दुरुस्त न होणे यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. शेतीपंपधारक शेतकऱ्यांनाही या समस्यांचा मोठा फटका बसत असून पिकांच्या सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत. 8 तास पूर्ण दाबाने वीज तसेच रात्री 6 ते 10 यावेळेत वीज बंद करण्यात आली होती ती देखील सुरळीत करण्यात आले असल्याचे लेखी महावितरणने लेखी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने आरती देवमाने यांनी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अपेक्षित तोडगा न निघाल्याने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते .आंदोलनाची तयारी सुरू असतानाच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत संबंधित मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने हाती घेणे, तक्रारींचे जलद निराकरण करणे आणि भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी उपाययोजना करणे यांचा समावेश आहे.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरती देवमाने यांनी सांगितले. मात्र, प्रशासनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता केली नाही, तर 15 एप्रिल रोजी महावितरण कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, नागरिकांनीही या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून, संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करून समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मा उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, गौतम कोल्हे, मा ग्रामपंचायत दिलीप वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक पठाडे, मिलिंद आव्हाड, संजय आव्हाड, बाळासाहेब रोडे , गुळवे सर, सुभाष मते, राजेंद्र ढगे, सुरेश रोडे, अतुल कथले, अतुल हजारे, अविनाश पठाडे, बाबासाहेब लेकुरवाळे, नामदेव कोल्हे, लक्ष्मण लांडगे , दीपक देवमाने, सह आदीं मान्यवर उपस्थित होते.यावेळी पोलिस उपनिरिक्षक जाधव यांनी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यावेळी महावितरण ज्युनियर इंजिनियर,शिंदे , ताटे, वायरमन गोरे आदी उपस्थित होते.