जामखेड न्युज—–
मुंबईत अतिक्रमणांविरोधात प्रशासनाला धारेवर धरणारे सभापती प्रा. राम शिंदे जामखेडमध्ये शांत का?
सभापती प्रा. राम शिंदे यांना नागरिकांचा थेट सवाल.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील वाढत्या अतिक्रमणांवर कठोर भूमिका घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश देणारे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आता आपल्या स्वतःच्या मतदारसंघातील जामखेड शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नाकडेही तितक्याच ताकदीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

मुंबईत अतिक्रमणांविरोधात प्रशासनाला धारेवर धरणारे नेते जामखेडमध्ये मात्र शांत का? असा थेट सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. जामखेड शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच महामार्गालगत वाढलेली अनधिकृत बांधकामे आणि फूटपाथवरील अतिक्रमण यामुळे शहराचा श्वास गुदमरू लागला आहे. वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी गंभीर बनल्या आहेत.

अतिक्रमणामुळे पाणीपुरवठा लाईन, गटारकामे आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामांनाही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विकासकामे रखडत असून प्रशासनालाही नियोजनबद्ध काम करणे कठीण होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतिक्रमणमुक्ती हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

नगर जिल्ह्यातील जामखेड शहर वगळता इतर सर्व ठिकाणची अतिक्रमणं निघाली आहेत. जामखेडचं अतिक्रमण का निघत नाही? असा सवाल देखील जनतेतून विचारला जात आहे. जिल्हाभरात कारवाईचा धडाका आणि जामखेडमध्ये मात्र शांतता — हा विरोधाभास नागरिकांना खटकत आहे.

जामखेड हा सभापती प्रा. राम शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने येथील प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. मुंबईप्रमाणेच जामखेडमध्येही अतिक्रमणविरोधी कारवाईचा ठोस आराखडा जाहीर करून प्रशासनाला स्पष्ट आदेश कधी दिले जाणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जामखेड मधील अतिक्रमणे का निघत नाहीत. अतिक्रमणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेकांनी गटारावर पक्के काम केले आहे. अनेकांनी तर गाळे काढून भाड्याने दिले आहेत. शासनाच्या जागा अनेक अतिक्रमण धारक आतापर्यंत वापरत आहेत. यामुळे शहरातील सगळेच रस्ते लहान झाले आहेत.

मुंबईत कठोर भूमिका घेणारे सभापती प्रा. राम शिंदे जामखेड बाबत गप्प का असाच प्रश्न जनता विचारत आहे.





