श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील ऋतुराज महादेव सोनवणे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या यशाचे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
ऋतुराज यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून व ग्रामीण भागात झाले आहे. त्यांच्या कुटुंबात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही, आई-वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यासाठी अपार कष्ट केले. आर्थिक अडचणी असूनही ऋतुराजने सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.
ऋतुराज हा आपल्या गावातून तसेच नातेवाईकांमध्ये प्रथमच शासकीय सेवेत भरती झालेला युवक ठरला असून, त्यामुळे हे यश केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण गावासाठी अभिमानाचे ठरले आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. राज्यातील महत्त्वाच्या शासकीय आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी MSF कडे असते. शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी थेट योगदान देण्याची संधी यातून मिळते.
या निवडीबद्दल चोंडी गावचे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती, सन्माननीय आदरणीय प्रा. राम शिंदे साहेब, गावचे सरपंच मालन अविनाश शिंदे, माजी सरपंच प्रा. अभिमान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, तसेच प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. संस्कृती सोनवणे, भीमराव सोनवणे, शहाजी सोनवणे, नानासाहेब सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी, मान्यवर नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी व दूरध्वनीद्वारे ऋतुराज यांचे अभिनंदन केले आहे.
सर्व स्तरांतून त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे. ऋतुराज सोनवणे यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली असून, शिक्षण, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.