जामखेड न्युज——
शिवजन्मोत्सव महिला समिती जामखेडच्या वतीने वढू बुद्रुक येथे दीपोत्सव साजरा
जामखेड येथील महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबविले जातात या वर्षी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड परिसरातील महिला व मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद, सारीका पठाडे, मीना बेलेकर, वृषाली शिंदे, पुनम हावले, ज्ञानेश्वरी टकले, निर्मला सावंत, सई पठाडे, सृष्टी काळे, तनुजा वीर, सानिका वीर, आकांक्षा नेटके, वैष्णवी नेटके, अनुराधा लाड यांच्या सह अनेक महिला व मुलींनी वुढू बुद्रुक येथे दीपोत्सव साजरा केला.
जामखेड शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद म्हणाल्या की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज हे, महाराष्ट्राची अस्मिता, अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आहे. हा इतिहास मुलांना माहिती व्हावा यामुळे येथे दीपोत्सव साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्य, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं.
महाराष्ट्र धर्माचं, स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांना, एकावेळी अनेक शत्रूंचा, अनेक आघाड्यांवर सामना करावा लागला. ज्ञान, गुण आणि चारित्र्यानं संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्यानं केला.
छत्रपती संभाजी महाराज इतके शूर, पराक्रमी होते की, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातला एकही किल्ला, स्वराज्याची एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आम्ही येथे दीपोत्सव साजरा करत आहोत.
( शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद )