जामखेड न्युज – – –
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज घोषणांचा धडाका लावला. यावेळी त्यांना अनेक आमदारांनी रस्त्यांच्या कामांबाबतची निवेदनेही दिली. ही निवेदने घेतल्यानंतर गडकरींनी या आमदारांना मिष्किलपणे टोलाही लगावला. आमदारांनी बरीच निवेदने दिली. असं वाटतं, मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालो, असं नितीन गडकरी यांनी मिष्किलपणे म्हटलं. त्यामुळे एकच खसखस पिकली.
नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नगरमध्ये होते. यावेळी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर नितीन गडकरींनी नगरकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत मिष्किल भाष्य केलं. मला बरेच निवेदनं आमदारांनी दिले. त्यामुळे मला प्रश्न पडलाय की महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहे का? तुम्ही दोन-दोन, चार-चार, पाच-पाच किलोमीटरच्या रस्त्यांच्या सीआरएफची लिस्ट मला द्याल तर मी कुठून काम करेल? मला भेटायला दिल्लीत येतात. मुंबईत येतात. पण कमी लांबीच्या रस्त्यांची कामे घेऊन येतात. त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची कामे घेऊन या, असं गडकरी म्हणाले.
तीन नव्या घोषणा कोणत्या?
यावेळी गडकरी यांनी तीन नवीन घोषणा केल्या. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा 548 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक, जामखेड ते सौताडा या रस्त्याचं 135 कोटीचं काम आणि जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड जोडणारा महत्त्वाचा मार्ग मी अॅन्यूअल प्लॅनमध्ये मंजूर करत आहे. त्याचं काम लगेच सुरू होईल. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा दौंड-मनमानमाड रेल्वे मार्गावर आहे. निम्मन गाव येथे रेल्वे उड्डाण पुलाचं काम मी मंजूर करत आहे. हे काम लवकर सुरू होईल. तसेच कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव-मनमाड-अहमदनगर हा दक्षिण व उत्तरेला जोडणारा अवजड वाहनांचा रस्ता आहे. शिर्डीला जोडणारा हा रस्ता आहे. त्याचंही काम मी मंजूर करत आहे. त्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी घोषणा गडकरी यांनी केली.
देशात 70 लाख टन साखर निर्मिती
मी तीन साखर कारखाने चालवतो, कारखाने जिवंत राहिले तर शेतकरी जिवंत राहिला पाहिजे. साखर करखान्यांनी शेतकऱ्यांचं शोषण करू नये. आपल्या देशात 70 लाख टन साखर जास्त निर्माण झाली आहे. हे चक्र उलटं फिरलं तर शेतकरी कारखाने आणि बँका डुबतील. त्यामुळे साखर कारखाने काढण्यास परवानगी देऊ नका. कारण साखर कोणीही घ्यायला तयार नाही, असं सांगतानाच साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करा. असं केल तर साखरेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत. 1 लाख 60 हजार कोटी रुपयांचे खाद्य तेल आयात करतो. ऊसात खाद्य तेल बिया लावल्या पाहिजेत. तीन इथेनॉल पंपाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आहे, असं गडकरी म्हणाले.
जिथे जातो तिथे सगळे असंच म्हणतात
आज नगर जिल्ह्यातील अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. सुजय विखे म्हणाले की, सर्वात जास्त निधी नगर जिल्ह्याला दिला. पण मी ज्या जिल्ह्यात आणि राज्यात जातो तिथे सगळेजण असंच म्हणतात. नगर जिल्हयाला विकासाची परंपरा आहे. पहिला साखर कारखाना या जिल्ह्यात तयार झाला. आता या जिल्ह्यात 23 कारखाने आहेत. या जिल्ह्याचं विकासात फार मोठं योगदान, आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न कोल्हापूरचं आहे. कारण तिथे साखर कारखाने सर्वाधिक आहेत. येणाऱ्या काळात साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा विकास किती मोठा आहे हे आपण जाणतो, असंही त्यांनी सांगितलं.










