जामखेड न्युज – – – – – –
जामखेडमध्ये कलेच्या नावाखाली धागडधिंगा, कागदपत्रे नसताना परवानगी कशी?” भानवसे यांचा गंभीर आरोप,
एसपी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार, १५ दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
जामखेड परिसरातील कलाकेंद्रात कलेच्या नावाखाली परराज्यातील मुलींना ठेवून धागडधिंगा सुरू आहे. तसेच जामखेड नगरपरिषद हद्दीतील काही कलाकेंद्रांच्या परवानग्या, आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. भारतीय भ्रष्टाचार निवारण समिती दिल्लीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भानवसे यांनी सांगितले की, काही कलाकेंद्रांकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसतानाही परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. एका कलाकेंद्राच्या बाबतीत सुमारे ९० टक्के कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा, तर दुसऱ्या ठिकाणी सुमारे ५० टक्के कागदपत्रांची पूर्तता नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही ठिकाणी एन.ए. परवानगी नसतानाही कलाकेंद्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

कलाकेंद्रांमध्ये परराज्यातील मुली कार्यरत असल्याचे सांगत, अशा ठिकाणी खरोखरच लोककलेचे कार्यक्रम होतात का, याचीही प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी भानवसे यांनी केली. “लोककलेच्या नावाखाली केवळ धांगडधिंगा सुरू असेल, तर त्यावर प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे भानवसे यांनी सांगितले. संबंधित कलाकेंद्रांची कागदपत्रे, परवानग्या, जागेचा वापर आणि इतर आवश्यक बाबींची प्रशासनाने तपासणी करावी, अशी त्यांची मागणी आहे.






