जामखेड तालुक्यात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी आता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजता ‘ढोल बजाव आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात निर्माण झालेल्या पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन, उडीद यांसह खरीप पिकांचे नुकसान झाले असून, येत्या काळात पाऊस झाला तरी त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचा दावा शेतकरी बांधवांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये— पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. तालुक्यात तात्काळ पीकविमा लागू करून त्याचा लाभ त्वरीत शेतकऱ्यांना मिळावा.
. रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्यात यावी. जामखेड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई, चारा, रोजगार आदी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. ‘एक शेतकरी–एक आवाज, एकजूट शेतकरी–मजबूत लढा’ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि एकजुटीसाठी लढा” असा संदेश देत प्रशासनाने या मागण्यांची दखल घ्यावी, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास १ सप्टेंबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर हजारोंच्या उपस्थितीत ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनासमोर असणार असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.