अखंड मराठा समाज अहिल्यानगरचा साखळी उपोषणास पाठिंबा
जामखेड शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सुरू असलेले साखळी उपोषण व आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अन्यथा येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अखंड मराठा समाज, अहिल्यानगरचे गोरख दळवी यांनी दिला आहे.
जामखेड येथे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाज, अहिल्यानगरच्या वतीने गोरख भाऊ दळवी, जगन्नाथ निमसे, गोरक्षनाथ पटारे, सोमनाथ गुंड, सागर भोसले, संदीप जगताप, गणेश नाईकनवरे, रत्नाकर दरेकर (काका), नितीन गव्हाणे, वैभव भोगाडे यांनी बुधवार, दि. ४ मार्च रोजी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
यावेळी त्यांनी नायब तहसीलदार पांडुळे यांचीही भेट घेऊन सुरू असलेल्या साखळी उपोषणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली.
पुढे बोलताना गोरख दळवी म्हणाले की, जामखेड शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून त्यामुळे शहराच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झाला आआली.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी तहसील कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला अखंड मराठा समाज, अहिल्यानगरचा जाहीर पाठिंबा असून या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात येणार आहे.
मात्र प्रशासनाने येत्या दोन दिवसांत शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा गोरख दळवी यांनी दिला. तसेच शासनाने या आंदोलनातील मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
साखळी उपोषणाला ग्रामपंचायतींचा पाठिंबा
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण व कामातील अनियमिततेविरोधात समाजसेवक अवधूत पवार यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाला जामखेड तालुक्यातील घोडेगाव व पाडळी ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.