जामखेड न्युज – – – –
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
का बदललं नाव?
खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं, यासाठी आपल्या देशभरातून लोकांची विनंती होती, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. “देशवासीयांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
“ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांमुळे आपण सर्व भारावून गेलो आहोत. विशेषतः हॉकीमध्ये आमच्या मुला -मुलींनी दाखवलेली इच्छाशक्ती, विजयाच्या दिशेने दाखवलेली जिद्द वर्तमान आणि भावी पिढीसाठी एक मोठी प्रेरणा आहे,” असं मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कुणाला मिळाला पुरस्कार
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास १९९१-१९९२ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस आहे.
मेजर ध्यानचंद यांच्याविषयी
फील्ड हॉकी खेळाडू, मेजर ध्यानचंद, द विझार्ड म्हणून प्रसिद्ध होते. १९२६ ते १०४९ पर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ४०० पेक्षा जास्त गोल होते. अलाहाबादमध्ये जन्मलेले ध्यानचंद १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये सुवर्णपदके जिंकणाऱ्या ऑलिम्पिक संघाचा भाग होते.






