जामखेड न्युज——
शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावार दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन केले असल्याची नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेला मिळणार चिन्ह कमी कालावधीत घरा घरात पोहचवा असे ठाकरे यांनी म्हटले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने त्यांच्या गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारमध्ये सत्तांतर झाले आहे. . एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करून शिवसेनेला नवे बळ दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात केली आहे.

शिवसेनेतून फुटलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यात त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटच पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार आहे. असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफिल राहू नका, पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. “माझी प्रकृती ठीक असल्याने आता आम्ही शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहोत,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विरोधकांशी हस्तांदोलन करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.









