जामखेड न्युज – – – –
बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळी भाग म्हणून तर आहेच पण काळाच्या ओघात शेती व्यवसायाचे चित्र बदलूनही (Farmer Suicide) शेतकरी आत्महत्यांचे सत्र मात्र सुरुच आहे. नापिकी आणि कर्जाबाजारीपणाला कंटाळून (Marathwada) मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. मध्यंतरीच गेवराई तालुक्यात अतिरिक्त ऊस फडातच उभा असल्याने त्रस्त शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असताना रविवारी जिल्हाभरात 4 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी या घटनेने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस प्रशासन घेत आहे. अधिकतर शेतकरी हे कर्जबाजारीपणा आणि नापिकी यामुळेच जीवन संपवत आहेत. विशेष म्हणजे चार पैकी तीन शेतकरी हे तरुण होते.
बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असले तरी एकाच दिवसात चौघांनी आपले जीवन संपवले आहे. यामागची कारणे समोर आली नसली तरी हे चौघेही शेतकरीच होते.
उमरद खालसा येथील चंद्रकांत भारत जाधव(28) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली
आष्टी तालुक्यातील मुर्षदपूर येथील 30 वर्षीय परशूराम तुकाराम जगताप यांनीही गळफास घेऊन जीवन संपवले आहे.
तिसरी घटना ही माजलगाव येथील असून रमेश नागुराव भोमडे (30) यांनीही गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील भीमा बाबुराव काटमोरे यांनी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिवसभरात 4 शेतकऱ्यांनी अशाप्रकारे जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या मागे काय कारण ?
जिल्ह्यात एकाच दिवशी चार आत्महत्याच्या घटना झाल्या असल्या तरी त्यामागचे नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून यामागे नेमके काय कारण याचा शोध आता पोलीस घेत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात नापिकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.









