जामखेड न्युज – – – –
भारतीय सैन्य दलात नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने अलिकडेच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी तब्बल 191 जागा रिक्त आहेत. पुरुष उमेदवारांसाठी 59 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) आणि महिला उमेदवारांसाठी 30 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) या जागांसाठी ही भरती असणार आहे.
ADVERTISEMENT

8 मार्च 2022 पासून या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. उमेदवारांना 6 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेत थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार अर्ज करतील, त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. भारतीय लष्कराच्या अधिकृत joinindianarmy.nic.in वरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराचं वय 20 पेक्षा कमी आणि 27 पेक्षा जास्त नसावं. याचाच अर्थ उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1995 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑक्टोबर 2002 नंतर झालेला नसावा.
थेट लेखी परीक्षेशिवाय होणार निवड
इंडियन आर्मीच्या SSC भरतीसाठी उमेदवारांची निवड सेवा निवड मंडळाद्वारे आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या मुलाखत प्रक्रियेद्वारे केली जाईल. या मुलाखतीसाठी उमेदवारांना त्यांच्या पात्रता पदवी गुणांच्या आधारे निवडलं जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार SSB साठी बोलावलं जाईल. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत पदवीची प्रत सादर करावी लागेल.









