जामखेड न्युज – – –
अहमदनगर येथील उड्डाणपुलाचे काम बहुचर्चित राहिले. अनेक वर्षांपासून हे काम रखडले होते. दरम्यान खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. हा निर्णय नगरकरांसाठी जणू ऐतिहासिकच ठरला. दरम्यान अनेक महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या कामामुळे हा पूल कधी पूर्ण होणार याही उत्सुकता सर्वानाच लागली आहे.
आता हा पूल दिवाळीच्या दिवशी लोकार्पण होईल, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. सर्वात जलद गतीने पूर्ण होणारा हा उड्डाणपुल असेल. त्यासाठी गिनिज बुककडेही नोंदणी केलेली असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरानावरून सुरु असणाऱ्या वादाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे नाव काय असावे हे जनता ठरवेल.
नामांतर केल्याने दुष्काळ मिटणार आहे का? लोकांचे प्रश्न मिटणार आहे का? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांची मागणी वैयक्तिक असल्याचे विखे यांनी सांगितले. राज्यातले सरकार अस्थिर आहे.
महाविकास आघाडीतील सरकारमधील पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्यात स्थिर सरकारची गरज आहे, असेही विखे म्हणाले. दरम्यान आता हा उड्डाण पूल होणार असल्याने नगरकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेची पूर्तता होणार आहे.









